सत्तेत आल्यानंतर जीएसटी पूर्णपणे बदलणार : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 12:16 PM (IST)
2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटीमध्ये बदल करु, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
सुरत : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता आल्यानंतर जीएसटीमध्ये व्यापक बदल करण्याचं आश्वासन दिलं आहे. 2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटीमध्ये बदल करु, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सत्ता आल्यानंतर जीएसटीमध्ये असा बदल करु, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल, असं राहुल गांधींनी सुरतमधील व्यापाऱ्यांशी बोलताना सांगितलं. तुम्हाला काय म्हणायचंय, त्यानुसार आम्ही काम करु, तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, असं राहुल गांधी म्हणाले. हिमाचल प्रदेशमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला होता. यावरही राहुल गांधींनी पलटवार केला. निती आयोगाच्या रिपोर्टनुसार हिमाचल प्रदेशात भ्रष्टाचार इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. विकासाच्या बाबतीत हिमाचल प्रदेश गुजरातच्या पुढे आहे, असा दावा राहुल गांधींनी केला. मोदी भ्रष्टाचाराच्या निवडक प्रकरणांवर बोलतात, असा आरोप राहुल गांधींनी केला. भाजपने रोजगार देण्याचा वादा केला होता त्याचं काय झालं? कधी व्यापम घोटाळा, ललीत मोदी घोटाळ्याबाबत कधी का बोलत नाहीत, जे भाजपशासित राज्यात झालेले आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.