जळगाव : भाजपकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला आहे, असं मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. गुलाबराव पाटील जळगावात आलेले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर त्यांनी मत मांडले.


राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, यावर जनतेचे शिक्कामोर्तब


गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


लोकांनी गद्दारीला चपराक दिली


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मोदींचा करिष्मा ओसरला का? यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी 'लाश वही है, बस कफन बदल गया है', अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.