WB Election 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे. कोरोना काळातील या सर्व निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत पश्चिम बंगालची निवडणूक राहिली. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. अशातच एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार असल्याचा अंदज वर्तवण्यात आला आहे. 


पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार टीएमसीला बंगालमध्ये 152 ते 165 जागा मिळणार आहेत तर भाजपला 109 ते 121 जागा मिळतील तर काँग्रेस-लेफ्ट आघाडीच्या खात्यात 14 ते 25 जागा जाणार असल्याचा अंदाज आहे.  


पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे. ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगाल काढून घेण्यासाठी भाजपनं सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. कोरोना संकटात जरी या निवडणूका पार पडल्या असल्या. तरी प्रचारसभांमध्ये काहीही कमतरता जाणवली नाही. अनेक दिग्गजांनी प्रचार सभांमध्ये भाग घेतल्याचं पाहायला मिळाल. प्रचार सभांमध्येही ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप अशी थेट लढत दिसून आली. 


बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी प्रचार फेऱ्यांचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळालं. बंगालमध्ये टीएमसीची प्रमुख नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हिलचेयरवर प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे 150 जाहीर सभांना संबोधित केलं. तर त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी हे रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचार करताना दिसले. 


बंगालमध्ये भाजपच्या वतीनं अगदी जोरात प्रचार सुरु होता. भाजपच्या पहिल्या ओळीचे नेते तळ ठोकून होते. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या. यातील बऱ्याच सभा या मतदानाच्या दिवशी होत्या. यावर टीएमसीनेही आक्षेप घेतला. तर अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या. काही सभाही त्यांनी घेतल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे.पी नड्डा हेदेखील प्रचारात उतरले होते. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील काही सभा घेतल्या. भाजप नेते राजनाथ सिंह, सिने अभिनेता मिथुन चक्रवर्ती हेदेखील भाजपच्या वतीनं प्रचारासाठी मैदानात उतरले होते. सर्व राज्यांच्या महिला अध्यक्षही प्रचारात होत्या. तर महाराष्ट्रातून विजया रहाटकर, विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, गिरीष महाजन हेदेखील बंगालमध्ये प्रचारासाठी पोहोचले होते. 


दरम्यान, 2 मे रोजी सर्व विधानसभा जागांचा निकाल जाहीर होणार असून ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतात की भाजप सत्तापालट करणार, काँग्रेस आणि डावे काय करिष्मा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Exit Poll Result 2021 : बंगालमध्ये ममता दिदी, आसाम-पुद्दुचेरीत भाजप, तामिळनाडूत डीएमके-काँग्रेस तर केरळमध्ये लेफ्टची सत्ता येण्याचा अंदाज