आगरतळा : त्रिपुरा विधानसभेच्या 60 पैकी 59 जागांसाठी आज 74 टक्के मतदान झालं, जे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 17 टक्के (91.82) कमी आहे. एका विधानसभा मतदार संघात उमेदावाराचा मृत्यू झाल्यामुळे मतदान 12 मार्चला घेण्यात येणार आहे.


'चलो पलटे' म्हणजेच बदल करा अशी घोषणा देत भाजपही निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरली आहे. 3 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्रिपुरामध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.

त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 31चा आकडा पार करणं गरजेचं आहे. यावेळी सीपीएम आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. भाजप इथं 50 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर इतर 9 जागी त्यांनी आपल्या मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत. तर काँग्रेस 58 आणि सीपीएम 56 जागा लढवत आहे.

यावेळी तब्बल 292 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्रिपुरामध्ये एकूण 25 लाख मतदार आहेत. 2013 साली येथील विधानसभा निवडणुकीत सीपीएमने 49 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. माणिक सरकार हे मागील चार टर्मपासून त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत.