एखाद्या दक्षिण भारतीय चेहऱ्याला संधी देण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळेच व्यंकय्या नायडू यांचं नाव जवळपास निश्चित समजलं जात होतं. एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांची नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जात होतं.
व्यंकय्या नायडू यांचा अल्प परिचय
व्यंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी सरकारमध्ये नायडूंकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं. नायडूंना 25 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे.
यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी
काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सत्ताधारी एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे.