Joshimath Land Subsidence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याशी जोशीमठ येथील खचत असलेल्या जमिनी संर्दभात चर्चा केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी धामी यांना दिले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी (Pushkar Singh Dhami) म्हणाले, 'पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी जोशीमठमधील (Joshimath)  परिस्थिती, लोकांच्या पुनर्वसन आणि सुरक्षिततेसाठी उचललेल्या पावलांबद्दल विचारणा केली आहे.'


उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी (Pushkar Singh Dhami) म्हणाले, 'जोशीमठमधील (Joshimath) परिस्थितीचे विश्लेषण केले जात आहे. इतर डोंगरी शहरांनी सहनशीलतेची मर्यादा गाठली आहे की, नाही हे देखील आम्ही पाहू.' ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी (PM Modi) जोशीमठ (Joshimath) वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.'


उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरात जमीन खचण्याच्या आणि अनेक ठिकाणी घरांना तडे गेल्याच्या घटनांनंतर पंतप्रधान कार्यालय (PMO) रविवारी या संकटावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा कॅबिनेट सचिव, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या सदस्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत जोशीमठ जिल्हा प्रशासन आणि उत्तराखंड सरकारचे वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आदल्या दिवशी जोशीमठला जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. याच्या एक दिवस आधी त्यांनी सुमारे 600 बाधित कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्याचे निर्देश दिले होते.


मुख्यमंत्री धामी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बाधित लोकांच्या मदत आणि बचावासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधल्या चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ Joshimath)  वसलं आहे. हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठीचं हे प्रवेशद्वार आहे. 20 हजार लोकवस्तीच्या या गावात 500 घरांना अशा मोठ्या भेगा पडल्यात. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढली आहेत. चारधामसाठी हायवे रुंदीकरणाचं काम इथं सुरु आहे, जे सध्या स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवलं गेलं. घरांना तडे गेल्याने जोशीमठमधून Joshimath) आतापर्यंत एकूण 66 कुटुंबांनी पलायन केले आहे.