उरीच्या सैन्यतळावर पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 11:46 AM (IST)
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 24 तास उलटल्यानंतर परत एकदा लष्कराच्या हेडक्वॉर्टरजवळ स्फोटाचे आवाज सुरु झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराचं हे हेडक्वॉर्टर भारत-पाक सीमारेषेपासून अवघ्या 10 किमीवर आहे. आता पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज येत असल्यानं नेमका हा दहशतवादी हल्ला आहे का याबाबत चर्चा सुरु झाली आहे. थोड्याच वेळात याबाबत नेमकं चित्र स्पष्ट होईल. या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी मोकाटच आहेत. काल झालेल्या हल्ल्यानंतर येथील भागात काल संध्याकाळपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन सुरु होतं. मात्र, आता स्फोटांचे आवाज पुन्हा येऊ लागल्यानं दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वेगळी रणनिती आखली आहे का याची देखील चाचपणी सुरु आहे. दरम्यान, लष्करानं ४ दहशतवाद्यांना आधीच कंठस्नान घातलं आहे. तर भारताचे १७ जवान यात शहीद झाले आहेत. संबंधित बातम्या: उरीमधील भ्याड हल्ल्यात भारताने कोणाला गमावलं? उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद