नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला (Pune) रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.
युपीएससी आयोगाकडून 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण 1009 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये, 335 सर्वसाधारण, 109 ईडब्लूएस, 318 ओबीसी, 160 एससी, 87 एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. विशेष म्हणजे 17 एप्रिल 2025 पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर, 7 जानेवारी 2025 पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. युपीएसीकडून 2024 च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण 1132 पदांसाठी भरती काढली होती.
दरम्यान, युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली सरशी दाखवून दिलीय.
आयटी कंपनीतील नोकरी सोडून UPSC ची तयारी
अर्चित डोंगरेहा मूळचा पुण्याचा असून त्याने शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. तर, महाविद्यालयीन शिक्षणसाठी पुणे गाठलं होतं. इंजिनिअरींगच्या पदवीनंतर 1 वर्षे आयटी कंपनीत काम केल्यानंतर त्याने युपीएससी परीक्षेसाठी आपली नोकरी सोडली. विशेष म्हणजे मागीलवेळी 2023 च्या निकालात युपीएससीमध्ये त्याने 153 वी रँक मिळवली होती. त्यानंतर, आयपीएसची निवड करुन तो सध्या आयपीएस प्रशिक्षणासाठी असल्याची माहिती आहे. त्याने, यावर्षी पुन्हा परिक्षा दिल्यानंतर तो आता देशात तिसरा आलाय. त्यामुळे, अर्चितने देशात महाराष्ट्राची पताका फडकवली आहे.