नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोगाने यंदा यूपीएससीच्या जागांमध्ये कपात केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यावर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवेतील (IPS) रिक्त पदांसाठी केवळ 980 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.


केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये 1079, तर 2015 मध्ये 1164 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. तर 2014 आणि 2013 मध्ये अनुक्रमे 1364 आणि 1228 अधिकाऱ्यांची भरती केली गेली.

याशिवाय 2012 मध्ये यूपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची 1091 जागा रिक्त भरण्यात येणार असल्याचं केंद्रीय लोकसेवा आयोगाने सांगितलं होतं. मात्र 2017 मध्ये यूपीएससी परिक्षेसाठी जो आकडा दिला आहे, त्यानुसार यंदा केवळ 980 जागांसाठीच परिक्षा घेतली जाणार आहे. यातील 27 पदं दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदाची यूपीएससीच्या जागांचा आकडा फारच लहान आहे.

वास्तविक, यूपीएससी परिक्षेसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी तयारी करत असतात. तीन टप्प्यातील ही परिक्षा प्रक्रिया पूर्ण करुन आयएस, आयएफएस, आयपीएससह केंद्रातील महत्त्वाच्या पदांवर रुजू होतात.  2017 मधील पहिल्या टप्प्यातील परिक्षा 18 जून रोजी घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, यंदा तीन वर्षांच्या अंतरानंतर जूनमध्ये पहिल्या टप्प्यातील परिक्षा घेण्यात येत आहे. यूपीएससीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2016,2015 आणि 2014 मध्ये ही परिक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. पण यंदा ही जूनमध्ये घेण्यात येणार असून, त्यासाठी 17 मार्चपर्यंतच अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे.