आगामी निवडणूक पानिपतच्या युद्धासारखी : अमित शाह
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2019 05:41 PM (IST)
आगामी लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखीच आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवेळी केले आहे.

नवी दिल्ली : "आगामी लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखीच आहे. पानिपतच्या युद्धात मराठे हरले, त्यानंतर भारताला 200 वर्षे गुलामीत काढावी लागली. आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांनी नेता आणि नेतृत्त्व नसलेल्या पक्षाला मतदान केले तर देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल". असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या वेळी केले आहे. शाह म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार आहे. कधीकाळी केवळ 2 जागा असणाऱ्या भाजपची आता 16 राज्यांमध्ये सत्ता आहे. पक्षाकडे बलाढ्य नेतृत्त्व आहे. परंतु आमच्या विरोधकांकडे नेतृत्त्व नाही. त्यामुळे एनडीएला सत्ता मिळवणे सोपे जाईल". शाह म्हणाले की, 2019 ची निवडणूक ही पानिपतसारखी लढाई आहे. ही लढाई भाजपने जिंकली तरच देशाचे भले होईल. नहीतर पुन्हा एकदा देश काही वर्षे मागे जाईल. मतदारांनी आगामी निवडणुकांमध्ये भरभरुन मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.