Kanpur GST Raid : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे गुटखा आणि परफ्यूम कंपनीवर टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 178 कोटींची रोकड, 23 किलो सोने आणि 6 कोटी रूपयांचे चंदन तेल जप्त करण्यात आले आहे. छाप्या दरम्यान सापडलेली रक्कम आणि घबाड मोजताना अधिकाऱ्यांची एकच दैना उडाली. 


कानपूर येथील परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन याच्या कंपनीवर काल आणि आज छापे टाकण्यात आले. यावेळी सापडलेली रक्कम आणि इतर घबाड पाहून अधिकारीही हैराण झाले. छाप्याची सर्व प्रक्रीया पार पाडून पीयूष जैन याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोठडी मिळालेला पीयूष जैन सतत आपले जबाब बदलत आहे. त्याच्या चौकशीत आणखी मोठी नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
 
जीएसटी चोरीवरून पीयूष जैनकडे एवढे मोठे घबाड समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार जैन याने 12 कोटींची जीएसटी रकमेची चोरी केली होती. छापा मारताना जीएसटी अधिकाऱ्यांनाही कल्पना नव्हती की, छाप्यात सापडलेली रक्कम मोजण्यासाठी मशीन आमि बॅंकेतील अधिकाऱ्यांना बोलवावे लागेल. 


अशी सुरू झाली कानपूर रेड
मिळालेल्या माहितीच्या आधारे जीएसटी टीम सुरूवातीला शिखर पान मसाल्याच्या कार्यालयात पोहोचली. टीमच्या मते शिखरने आपली चूक मान्य करून 3 कोटी 9 लाखांच्या जीएसटीची चोरी केल्याचे सांगितले. त्याचवेळी जीएसटी टीमने याच प्रकरणासोबत संबध असणाऱ्या ओडोकॅम इंडस्ट्रीज आनंदपुरी कारपूर येथे छापा मारला. ही कंपनी शिखरला परफ्यूम पूरवत होती. जीएसटी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार काही कोटी रूपयांची रक्कम जप्त केल्यानंतर ही छापेमारी पूर्ण होईल असे वाटत होते. परंतु, याठिकाणी मिळालेली रक्कम पाहून अधिकारी चकीतच झाले. कारण छाप्यातील रक्कम मोजून संपतच नव्हती. त्यामुळे पैसे मोजण्यासाठी पैसे मोजण्याच्या मशीनसह बॅंक अधिकाऱ्यांना बोलवण्याची वेळ आली. बॅंक अधिकाऱ्यांकडून ही रक्कम मोजून संपली त्यावेळी ती तब्बल 178 कोटींवर पोहोचली होती.
 
छाप्यात सापडलेले एवढे पैसे ठेवतात कोठे?
देशभरात रोज असे अनेक छापे पडत असतात. यामध्ये रोज शेकडो कोटींची रक्कम सापडत असते. परंतु, अनेकांना प्रश्न पडतो की, एवढी मोठी रक्कम कोठे ठेवली जाते. कायद्यानुसार ही रक्कम स्टेट बॅंक अॉफ इंडियामध्ये ठेवली जाते. संबंधीत प्रकरणाचा संपूर्ण तपास होईपर्यंत ही रक्कम बॅंकेतच ठेवली जाते. जर पीयूष जैन ही रक्कम गैर मार्गाने कमवली नाही हे सिद्ध करू शकला तर जेवढे दिवस हे पैसै बॅंकेत राहतील तेवढे दिवसांचे व्याज लावून सरकारला ही रक्कम परत करावी लागते. 


महत्वाच्या बातम्या