UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. पण उत्तर प्रदेशकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे. मागील तीन दिवसांत उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. तीन दिवसांत तीन मंत्री आणि आठ आमदारांनी भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपसाठी ही चिंतेची गोष्ट मानली जात आहे. 


विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. प्रचारालाही सुरुवात झाली आहे. असे असतानाच भाजपला आतापर्यंत 14 नेत्यांनी रामराम केलाय. गुरुवारी सत्ताधारी भाजपमधील मंत्री धर्म सिंह सैनी यांनी राजीनामा दिलाय. धर्म सिंह सैनी यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी बातचीत केली आहे. ते समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी बुधवारी दारा सिंह चौहान आणि मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनीही अखिलेश यादव यांच्याशी बातचीत केली होती. याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.  
 
आतापर्यंत यांनी केलाय भाजपला रामराम -
1.स्वामी प्रसाद मौर्य
2.भगवती सागर
3.रोशनलाल वर्मा
4.विनय शाक्य-
5.अवतार सिंह भाड़ाना
6.दारा सिंह चौहान
7.बृजेश प्रजापति
8.मुकेश वर्मा
9.राकेश राठौर
10.जय चौबे
11.माधुरी वर्मा
12.आर के  शर्मा
13. बाला अवस्थी
14 धर्म सिंह सैनी






उत्तर प्रदेशमध्ये जातीय समीकरणाला महत्व
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राइतकंच जातीय समीकरणांचं महत्व आहे. तिथं ओबीसी समाजाचं अनेक मतदारसंघांमध्ये वर्चस्व आहे. तर काही मतदारसंघांमध्ये याच मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांचं जाण्यानं भाजपला फटका बसणार की मोदी-योगींच्या झंझावातासमोर त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे 10 मार्चलाच कळेल.