नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. टप्प्याटप्प्याने अनलॉक केला जात आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात अनलॉक 3.0 सुरु असतानाच, आता अनलॉक 4.0 ची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत गृहमंत्रालयाचही तयारी जोरदार सुरु आहे. अनलॉक 4.0 ची नवी नियमावली या आठवड्याच्या शेवटी जाहीर केली जाईल. काही गोष्टी वगळता, इतर आवश्यक गोष्टींवर शिथिलता दिली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


सरकार 1 सप्टेंबरपासून शाळा, मुंबईतील लोकल सेवा आणि दिल्लीतील मेट्रो सेवा सुरु करणार का याची सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 34 लाखांच्या वर पोहोचली असून आतापर्यंत 61, 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


अनलॉक 4.0 मध्ये कोणते बदल होऊ शकतात?




  • केंद्र सरकार दिल्लीतील मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. 22 मार्चपासून दिल्ली आणि एनसीआरमध्ये मेट्रो सेवा बंद आहे. इथे टिकटिंग सिस्टम लागू केली जाऊ शकते आणि आता टोकनचा वापर करण्याची परवानगी नसेल.

  • कोविड-19 नियमाचं पालन करणं, जसं की मास्क न घालणं, सोशल डिस्टन्सिंग आणि परिसरात थुंकणं किंवा कचरा टाकल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो.

  • शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील, तर बारच्या काऊंटरवर दारु मिळू शकते.

  • चित्रपटगृह देखील बंद राहतील कारण 25 ते 30 टक्के क्षमता असलेले शो चालवणं शक्य नाही.

  • कर्नाटक सरकारने म्हटलं आहे की, विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचं शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन वर्गाद्वारे सुरु होणार, तर ऑफलाईन वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरु होऊ शकतात.

  • कर्नाटक हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी चित्रपटगृह आणि रेस्टॉरंटमध्ये दारुच्या विक्रीला परवानगी मिळू शकते.

  • अनलॉक 4.0 मध्ये, कोविड-19 हॉटस्पॉटमधून देशांतर्गत विमानांना कोलकातामध्ये उतरण्याची परवानगी दिली जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "आमच्याकडे सहा कोविड-19 हॉटस्पॉट राज्यांमधून उड्डाणं पुन्हा सुरु करण्याची विनंती करण्यात आली होती. 1 सप्टेंबरपासून सहा राज्यांमधून (दिल्ली, मुंबई, पुणे, नागपुर, चेन्नई आणि अहमदाबाद) विमान सेवा आठवड्यातून तीन वेळा पुन्हा सुरु होऊ शकते."

  • तर राज्यात पब आणि क्लब पुढील महिन्यात सुरु होण्याची अपेक्षा आहे, पश्चिम बंगालमध्ये आठवड्यात दोन वेळा पूर्ण लॉकडाऊन राहिल.

  • मुंबईमध्ये लोकल ट्रेन अनलॉक 4.0 मध्ये पुन्हा सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. वैध कारणाशिवाय बाहेर पडल्यास तर वाहनं रोखली जातील, असा इशारा मुंबई पोलिसांनी वाहनचालकांनाही दिला आहे.

  • चेन्नईने घोषणा केली आहे की, आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास अनिवार्य असेल. शहरात अनलॉक 4.0 मध्ये दारुची दुकानं आणि हॉटेलवरील नियमांमध्ये काहीशी शिथिलता दिली जाऊ शकते.