अमरावती : सध्या सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकवर सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर, यावरील निकाल राखून ठेवला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आपल्या वक्तव्याद्वारे मुस्लीम समाजाला इशारा दिला आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


जर मुस्लीम समाज तिहेरी तलाक प्रथेत बदल घडवणार नसेल, तर सरकार कठोर पावलं उचलून कायद्याद्वारे त्यावर बंदी घालेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

व्यंकय्या नायडू म्हणाले की, ''तिहेरी तलाकवर निर्णय घेणं हे त्या समाजावर अवलंबून आहे. पण ही प्रथा बंद करण, त्यांच्यासाठी योग्य असेल. अन्यथा सरकारला त्यासाठी कायदा करुन बंदी घालावी लागेल.''

नायडू पुढे म्हणाले की, ''या प्रकरणात हस्तक्षेप करणे हे व्यक्तीगत नाही. तर मुस्लीम समाजातील महिलांच्या समानतेच्या अधिकाराचा प्रश्न आहे. सर्व महिलांना समान अधिकार असलेच पाहिजेत. जर हिंदू समाजातील बालविवाह, सती प्रथा आणि हुंडा आदी प्रथा बंद करण्यासाठी कायदे केले असतील. तर मुस्लीम समाजातील महिलांसाठीही कायदा करुन, त्यांना समानतेचा अधिकार दिला जाईल.''

यावेळी त्यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले की, ''भारतानं इतिहासात पहिल्यांदाच आतंरराष्ट्रीय न्यायलयात धाव घेतली. आणि पाकिस्तानचा मुर्खपणाच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाला स्थगिती द्यावी लागली. याचा सर्वांना आनंद झाला पाहिजे.''

शिवाय, आपल्या राजकीय कारकीर्दीच्या काळात मोदींनी दहा वर्ष या देशाचं नेतृत्व करावं अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, ''सध्या देशाचा मूड मोदींसोबत आहे. जर मोदींनी दहा वर्ष भारताचं पंतप्रधान पद भूषवलं, तर जगात भारत एक महासत्ता म्हणून उभारला असेल.''