देहरादून : बद्रीनाथमध्ये शुक्रवारी झालेल्या भूस्खलनानंतर आता तिथून बाहेर पडण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. बद्रीनाथहून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर 20 ते 25 किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळत आहेत.


या वाहतूककोंडीत तब्बल 10 हजारांपेक्षा जास्त गाड्या अडकल्या असल्याचं वृत्त आहे. सध्या या गाड्या अतिशय धिम्या गतीनं बाहेर पडताना दिसत आहेत.

उत्तराखंडमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोशी मठापासून 9 किमी अंतरावर, विष्णूप्रयागजवळ डोंगरकडा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा कडा थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे हा रस्ताच बंद झाला होता.

या दुर्घटनेनंतर 27 तासापासून जवळपास 15 हजार भाविक बद्रीनाथमध्ये अडकले होते. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102 भाविकांचाही समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ही दरड बाजूला करुन महामार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर  सुरु होते. पण आज हा रस्ता मोकळा झाल्यानंतर बद्रीनाथमधून बाहेर पडण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

यामुळे बद्रीनाथकडे जाणाऱ्या महामार्गावर जवळपास 20 ते 30 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान आज सकाळीही भूस्खलन झाल्याने महामार्ग बंद झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, यापूर्वी 2015 मध्येही भूस्खलन झालं होतं. त्यावेळी हा रस्ता जवळपास आठवडाभर बंद होता. त्यावेळी सरकारने भाविकांना बाहेर काढण्यासाठी सबसिडी तत्त्वावर हेलिकॉप्टर यात्रा सुरु केली होती. आता मात्र हा रस्ता 2 दिवसात सुरळीत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, औरंगाबादच्या 102 भाविकांसह 15 हजार जण अडकले