नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर असलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर भारतात परतले आहेत. एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केलाय. भारतात परतल्यानंतर मात्र अकबर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरं जाणं टाळलं. आरोपांवर मी नंतर बोलेन असं स्पष्टीकरण अकबर यांनी दिलंय.


अकबर यांच्यावरील आरोपांची भाजपनेही दखल घेतलीय. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असं कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. विरोधी पक्षांनीही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय.

लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांना सरकारने नायजेरिया दौरा आटोपून भारतात परत येण्याचे आदेश दिले होते.

पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


#MeToo चं वादळ

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून सिनेदिग्दर्शक साजिद खान, विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.