नवी दिल्ली: एनडीएच्या बैठकनंतर पंतप्रधान मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देखील होते.


या बैठकीला महाराष्ट्रातून रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

दिल्लीत मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली जाईल, याबाबत एनडीएतील घटकपक्षांचं एकमत झालं. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 32 घटकपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरची एनडीएची ही दुसरी बैठक आहे.

आर्थिक सुधारणांवर चर्चा

एनडीएचं लोकसभा निवडणुकीनंतरचं इतर राज्यातील यश पाहता ही सरकारच्या यशस्वी धोरणांची जनतेने दिलेली पावती आहे. सरकारकडून सध्या आर्थिक सुधारणेसाठी काय प्रयत्न केले जात आहेत, त्यावरही एनडीएच्या बैठकीत चर्चा झाली, असं अरुण जेटलींनी सांगितलं.

दरम्यान, या बैठकीपूर्वी अमित शाह आणि आणि उद्धव ठाकरे यांच्यात 15 मिनिटं चर्चा झाली. मात्र, ही चर्चा नेमकी कशाबाबत झाली याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.