नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर देशातील सर्वच एटीएम सेंटर बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. पैशांसाठी अनेकांनी तासनतास एटीएमच्या रांगेत उभे राहावे लागले, पण जेव्हा त्यांचा नंबर आला, तेव्हा एटीएममधले पैसे संपल्याने अनेकांची घोर निराशा झाली. पण याच परिस्थितीत जर तुम्हाला सांगितले की, एटीएममधून 500 रुपये काढायला गेल्यावर  तिथे दोन हजाराच्या पाच नोटा मिळत आहेत? तर अनेकांना अश्चर्या वाटेल.


पण अशी घटना राजस्थानधील टोकमध्ये घडली आहे. टोकमधील बँक ऑफ बडोदाच्या एका एटीएम सेंटरमधून अचानक लाखो रुपये निघू लागल्याने नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. टोकमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या या एटीएममधून पाचशेच्या रुपयांच्या बदल्यात दोन हजारांच्या पाच नोटा निघत होत्या.

या घटनेनंतर ज्यांना एक हजार रुपये हवे होते, त्यांना या एटीएममधून दोन हजाराच्या दहा नोटा मिळाल्या. विशेष म्हणजे, एटीएम सेंटरमधून अशी बेहिशेबी रक्कम निघत असल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनीही एटीएम सेंटरबाहेर एकच गर्दी केली. या एटीएम मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांनी चक्क सहा लाखांची रोकड काढली.