Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले, देशात अनेक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) झाले आहेत, पण टी.एन. शेषन (T. N. Seshan) यांच्यासारखे व्यक्तिमत्व क्वचितच घडतात. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, संविधानाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांच्या खांद्यावर अधिकारांचं प्रचंड ओझं दिलेलं आहे, अशावेळी न्यायालयाने दिवंगत टी एन शेषन यांची आठवण करत अशा भक्कम स्वभावाची व्यक्ती पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.


'सीईसी पदासाठी आपल्याला सर्वोत्तम व्यक्ती शोधावी लागेल' - सर्वोच्च न्यायालय
न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश राय आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'देशात अनेक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) झाले आहेत आणि टीएन शेषन क्वचितच घडतात. असे आम्हाला वाटते. या दोन निवडणूक आयुक्त, एक मुख्य निवडणूक आयुक्त अशा तीन व्यक्तींच्या खांद्यावर राज्यघटनेने प्रचंड अधिकार दिले आहेत. सीईसी पदासाठी आपल्याला सर्वोत्तम व्यक्ती शोधावी लागेल. प्रश्न हा आहे की या पदासाठी आपण सर्वोत्तम व्यक्तीची निवड कशी करायची आणि नेमणूक कशी करायची? असा प्रश्न न्यायालयाला पडला आहे.


18 वर्षांत 14 मुख्य निवडणूक आयुक्त बदलले


2004 पासून एकही मुख्य निवडणूक आयुक्त आपला 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. हा मुद्दा न्यायालयाने आपल्या टिप्पणीत अधोरेखित केला. न्यायालयाने म्हटले आहे की, "2004 पासून कोणत्याही सीईसीने सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आणि यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सहा सीईसी आणि एनडीए सरकारच्या आठ वर्षांत आठ सीईसी होते."


टीएन शेषनचा उल्लेख का करण्यात आला?


न्यायालयाने म्हटले, टी.एन. शेषन हे तामिळनाडू केडरचे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होते. टी.एन. शेषन यांनी 27 मार्च 1989 ते 23 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे 18 वे कॅबिनेट सचिव म्हणून काम केले. 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 पर्यंत ते भारताचे  मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि 11 डिसेंबर 1996 पर्यंत या पदावर राहिले. मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने टी. एन. शेषन यांच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांमुळे निवडणूक आयोगाला नवी ओळख दिली. दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सीईसी म्हणून त्यांचा कडकपणा हे उदाहरण ठरले. बूथ कॅप्चरिंगसाठी बिहार कुप्रसिद्ध होता. शेषन यांनी निवडणुकीत केंद्रीय सैन्य तैनात केले. त्यावेळी शेषन यांनी बूथ कॅप्चरिंग आणि हिंसाचार रोखण्यात यश मिळवले. टी एन शेषन यांच्यामुळे देशातील जनतेला, निवडणुका कोण चालवतात? निवडणुकीचे नियम काय आहेत/ हे कळले.


CEC आणि EC च्या निवडीसाठी कॉलेजियम सारख्या प्रणालीचा विरोध


कोर्टाने केंद्रातर्फे उपस्थित असलेले अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांना सांगितले की, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आयोगाच्या प्रक्रियेचे पालन करतो, जेणेकरून एक सक्षम व्यक्ती, मजबूत चारित्र्याची व्यक्ती सीईसी म्हणून नियुक्त केली जाईल. वेंकटरामानी म्हणाले की, सर्वोत्कृष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्यास कोणाचाही आक्षेप नाही, पण ती कशी करता येईल हा प्रश्न आहे. 23 ऑक्टोबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने CEC आणि EC च्या निवडीसाठी कॉलेजियम सारखी प्रणाली मागणारी जनहित याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवली होती. 17 नोव्हेंबर रोजी, केंद्राने CEC आणि EC च्या निवडीसाठी या याचिकांना जोरदार विरोध केला आणि म्हटले की, असा कोणताही प्रयत्न म्हणजे घटनादुरुस्ती आहे.