पश्चिम बंगालमधील बर्धवानमध्ये अपघात, लातूरच्या तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 12:30 PM (IST)
मुंबई : पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ वरील बर्धवान येथे आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात लातूरच्या तीनजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरहून चारधाम यात्रेसाठी एक बस निघाली होती. ही बस दोन धामांची यात्रा संपवून कोलकताला निघाली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ वरील बर्धवान येथे पहाटे ३.४५ वाजता या बसची RJ 04 GA 0555 या लॉरीला मागून धडक झाली. या अपघातात बसचा ड्रायव्हर, क्लीनर, आणि एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण सातजण गंभीर झाले आहेत. जखमींना बर्धवान येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या बसमधून एकूण ४८ प्रवासी प्रवास करीत होते. हा अपघात ड्रायव्हरला गाडी चालवताना झोप आल्याने झाल्याचे बसमधील प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे.