मच्छिलमध्ये हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2017 07:47 PM (IST)
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या मच्छिल भागात झालेल्या हिमस्खलनात पाच जवान शहीद झाल्याची माहिती आहे. दुर्दैवाने यामध्ये महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेझ भागात हिमस्खलन झाल्याची घटना ताजी असतानाच 28 जानेवारीला मच्छिल भागातही हिमस्खलन झालं. यामध्ये पाच जवान गाडले गेले होते, मात्र त्यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. परंतु मच्छिल भागातील हवामान आणि योग्य ती वैद्यकीय मदत मिळू न शकल्यामुळे पाचही जणांचा मृत्यू झाला. हिमस्खलनामध्ये महाराष्ट्रातील तिघे जवान शहीद झाले. साताऱ्यातील वाई तालुक्यातले 30 वर्षीय शिपाई गणेश किसन ढवळे, सांगलीतील कवठे महंकाळचे 34 वर्षीय नाईक रामचंद्र श्यामराव माने, आणि परभणीतील चे 26 वर्षीय शिपाई बालाजी भगवानराव अंबोरे यांचा समावेश आहे. तामिळनाडूच्या मदुराईतील 27 वर्षीय जनरल थामोथारा कन्नन आणि गुजरातच्या भावनगरमधील 27 वर्षीय देवा हाझा भाई परमार हे जवानही हिमस्खलनात शहीद झाले आहेत. शहीद शिपाई बालाजी भगवानराव अंबोरे--------- शहीद शिपाई गणेश किसन ढवळे---------शहीद नाईक रामचंद्र श्यामराव माने---------
जम्मू काश्मीरमधील बांदीपुराच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 15 जवानांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील तीन वीरपुत्र शहीद झाले होते. अकोल्याचे संजू सुरेश खंदारे, अकोल्याचेच आनंद गवई आणि बीडचे विकास समुंदरे अशी महाराष्ट्रातील शहीद जवानांची नावं आहेत. सलगच्या बर्फवृष्टीमुळे 25 जानेवारीच्या संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही जवान हिमस्खलनात अडकले. यामध्ये 15 जवानांचा मृत्यू झाला
बेळगावचे मेजर श्रीहरी कुगजी यांनी जम्मू-काश्मीरच्या हिमस्खलनात मृत्यूला हरवलं. सोनमर्ग इथे कर्तव्य बजावताना हिमस्खलनामुळे मेजर कुगजी बर्फाखाली अडकले होते. पण याच दरम्यान त्यांच्या हाती लागलेल्या कुलूपाने बर्फ फोडून ते बाहेर आले. सोनमर्गमध्ये हिमस्खलन झाल्याने त्या ठिकाणी असलेलं छप्पर बर्फ कोसळल्यामुळे खाली आलं आणि श्रीहरी कुगजी 15 फुटांच्या बर्फाखाली अडकले. त्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. कुगजी यांच्या हाती ट्रंकला लावायचं कुलूप लागलं. त्या कुलुपाने जमेल तसं बर्फ फोडू लागले. अखेर बोट बाहेर पडण्याइतकी जागा त्यांनी तयार केली आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी मृत्यूला हरवलं.