नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवसांत या दोघांची दिल्लीत दुसऱ्यांदा भेट होत आहे. यापूर्वी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली होती. दोघांमध्ये सुरु असलेल्या भेटीच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात आजपर्यंत तीन भेटी झाल्या. या दोघांची पहिली भेट शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर झाली होती. 


दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतात. मात्र तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या 48 तासांमधील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. तर पंधरा दिवसातील ही तिसरी भेट आहे. अशातच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा विषय नव्हता.  मात्र सध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यामध्ये विरोधकांना कसं आणखी आक्रमक होता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. अशातच प्रशांत किशोर यांनी यापूर्वीत आपण निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळेच या भेटीच्या सत्राबाबत सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, काल शरद पवारांच्या विरोधात 15 नेत्यांची बैठक पार पडली आणि मोदी सरकारच्या विरोधात संभाव्य तिसऱ्या आघाडी विरोधातील चर्चांना उधाण आलं. मात्र सध्या तिसऱ्या आघाडीचा विषय अजेंड्यावर नाही, असं शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. सध्याच्या राजकीय स्थितीसंदर्भात अधिक आक्रमक होण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा कालच्या बैठकीत झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. कोरोना काळात मोदींच्या प्रतिमेला तडा गेलाय, पण समोर मजबूत पर्याय नसल्यानं राजकीय फटका किती बसेल याबाबत शंका असल्यानं विरोधकांनी रणनीती आखण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.  


प्रशांत किशोर यांचा निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास


प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की, "मी जे आता करत आहे ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केलं. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार संन्यास घ्यायचा आहे," 


पश्चिम बंगाल निवडणूकीत प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला


"पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनितीकार म्हणून काम सोडेन," असं निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भातील ट्वीट पिन देखील करुन ठेवलं होतं. त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, अखेर निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला.


प्रशांत किशोर यांची कारकीर्द


निवडणूकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी  ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. बिहार विधानसभा निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणूकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते.