Dr Mansukh Mandaviya : दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देण्यासारखी मानवतेसाठी दुसरी मोठी सेवा असू शकत नाही, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी केलं. वर्षाला 15,000 हून अधिक लोक अवयव दान (organ donation) करत असल्याचे ते म्हणाले. 13 व्या भारतीय अवयव दान दिन (आयओडीडी) समारंभात ते बोलत होते. यावेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल तसेच मृत व्यक्तींच्या अवयव दानाबद्दल जनजागृती केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.


अवयवदानाबाबत अधिकची धोरणे आणि सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबद्ध 


या समारंभाला संबोधित करताना डॉ. मांडविया म्हणाले की, या कार्यात सहभागी झालेल्या सर्व लोकांच्या योगदानाची ओळख करुन त्यांचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. 2013 मध्ये 5000 लोक अवयव दान करण्यासाठी पुढे आले होते. आता वर्षाला 15,000 हून अधिक लोक अवयव दान करत असल्याची माहिती मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. अवयवदानात वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावले उचलली असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. देशात अवयवदानाबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी अधिकची धोरणे आणि सुधारणा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे डॉ. मांडविया म्हणाले.


अवयवदाते, त्यांचे कुटुंबीय आणि नागरी समाजातील सदस्यांच्या योगदानाचे डॉ. मांडविया यांनी कौतुक केले. त्यांच्या प्रेरक हेतूचे आणि समर्पणाचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) ई-न्यूज लेटर, ट्रान्सप्लांट मॅन्युअल( (प्रत्यारोपण अहवाल) आणि ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर (प्रत्यारोपण समन्वयक) प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमादरम्यान, आयसीएमआर (ICMR) ची 'मेक इन इंडिया' उत्पादने जसे की, नॉव्हेल हिमोफिलिया ए रॅपिड कार्ड टेस्ट आणि वॉन विलेब्रँड डिजीज रॅपिड कार्ड टेस्ट आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाच्या, ई केअर (eCARE) पोर्टलचे (ई-क्लिअरन्स ऑफ आफ्टर लाईफ रीमेन्‍स) लोकार्पणही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


ई केअर (eCARE)पोर्टल


जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या देशात मृत्यू होतो, तेव्हा मृत व्यक्तीचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी अनेक कागदपत्रे आणि प्रक्रिया कराव्या लागतात. ज्यामुळं कुटुंबीय आणि मित्र परिवाराला निराशेचा सामना करावा लागतो. या समस्येची संवेदनशीलता समजून घेऊन आणि किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन या तत्त्वाचे पालन करण्यात येत आहे. या माध्यमातून भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विविध देशांमधून पार्थिव शरीर भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी ई-केअर (ई-क्लिअरन्स ऑफ पोस्ट-लाइफ रिमेन्स) पोर्टल सुरू केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : तिघांना दिलं जीवदान! अवयव दानाचा फॉर्म भरला अन् चारच दिवसात अवयव दान करण्याची दुर्दैवी वेळ