Tejashwi Yadav :  आमच्याकडे बिहारची सत्ता असताना आम्ही 17 महिन्यात चांगले काम केले. आता कुठं खेळ सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता दलाचे नेते (RJD) आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी म्हटले. बिहारची जनता नितीशकुमार (Nitishkumar) यांना प्रत्युत्तर देईल असा विश्वासही  तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला. 


जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी राजदसोबतची आघाडी तोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. बिहारमधील या राजकीय घडामोडींनी देशभरात खळबळ उडाली  आहे. नितीशकुमार यांनी आघाडी तोडल्यानंतर राजद नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांनी म्हटले की, आम्ही विरोधी बाकांवर असताना नोकरभरतीची मागणी करत होतो. त्यावेळी नितीशकुमार यांनी नोकरभरतीसाठी पैसा कुठून येणार असा प्रश्न केला होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी आमच्यासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नोकरभरतीचा शब्द पाळला. पर्यटन, रोजगार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले. आयटी कंपन्यांबाबत आम्ही एक धोरण तयार केले. 17 महिन्यात आम्ही दोन लाख लोकांना नियुक्तीपत्र दिले. थकलेल्या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही इतकं काम करून घेतलं असल्याचेही तेजस्वी यादव यांनी म्हटले.मी जे म्हणतो, ते करून दाखवतो असेही त्यांनी म्हटले.


आम्ही नाराज नाही, भाजपचे आभार; तेजस्वींचा टोला


नितीशकुमार यांच्या निर्णयावर आम्ही नाराज अथवा संतापलो नाहीत असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले. नितीशकुमार यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी करणार नाही. जेडीयू 2024 च्या निवडणुकीनंतर संपलेला पक्ष असेल असेही यादव यांनी म्हटले. भाजपने नितीशकुमार यांना सोबत घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे तेजस्वी यादव यांनी उपरोधिकपणे म्हटले. 


शिक्षण, आरोग्य क्षेत्रात आम्ही महत्त्वाची कामे केली, मोठे निर्णय घेतले. मागील आरोग्य विभागातील एक लाख रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र, नितीशकुमार यांच्या जेडीयूने त्याची फाईल अडवून ठेवली असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. 


खेळ आता सुरू झालाय


खेळ संपला नसून आता खऱ्या अर्थाने खेळ सुरू झाला असल्याचे सूचक वक्तव्य तेजस्वी यादव यांनी म्हटले. याआधी कोणी काय म्हटले, यात आम्हाला रस नाही. आम्ही सरकारमध्ये 17 महिने जेवढं काम केले, तेवढं काम नितीशकुमार-भाजप यांना 17 वर्षात करता आले नसल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही लोकांमध्ये केलेल्या कामाच्या आधारे जाणार असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले.