लखनौ : आरुषी-हेमराज हत्याकांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तलवार दाम्पत्य चार वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची पुरव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


राजेश तलवार आणि नुपूर तलवार गेल्या चार वर्षांपासून गाझियाबादमधील डासना तुरुंगात कैद होते. चार वर्षांनी या दोघांची सुटका करण्यात आली. गेल्या नऊ वर्षांपासून तलवार कुटुंबाने दिवाळी साजरी केलेली नाही. मात्र यावर्षी दिवाळी साजरी करु, असं राजेश तलवार यांच्या कुटुंबीयांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.

स्वतःचीच मुलगी आरुषी आणि घरातील नोकर हेमराज यांचा खून केल्याच्या आरोपावरुन तलवार दाम्पत्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात तलवार दाम्पत्याने हायकोर्टात धाव घेतली. मात्र आरुषी आणि हेमराज यांचा खून तलवार दाम्पत्याने केला हे सिद्ध करणारे सबळ पुरावे सीबीआयकडे नाहीत, असं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाने दोघांचीही निर्दोष मुक्तता केली.

जेलमध्ये कमावलेले पैसे दान
तलवार दाम्पत्याने जेलमध्ये 1417 दिवसांत कमावलेले 99 हजार रुपये त्यांनी कैद्यांच्या कल्याणासाठी जेल प्रशासनाला दान केले आहेत. जेलमध्ये असताना राजेश तलवार यांनी मुरादनगरच्या आयटीएस हॉस्पिटलच्या सहकार्याने तयार केलेल्या डेंटल क्लिनिकमध्ये पूर्णवेळ दिला. यादरम्यान त्यांनी जेल अधिकारी आणि कैद्यांच्या दातांवर इलाज केला. तर नुपूर तलवार यांनी त्यांचा वेळ मुलं आणि अशिक्षित महिलांना साक्षर करण्यात घालवला. या दोघांनी मिळून प्रत्येकी 49 हजार 500 रुपये कमावले.

अखेरच्या दिवशी कैद्यांची गर्दी
हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर तलवार दाम्पत्य रविवारचा संपूर्ण दिवस सहकारी कैद्यांना भेटलं आणि बॅरेकमध्ये आपलं सामन बांधलं. तर रविवारी जेलच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अखेरच्या दिवशी दात चेक करणाऱ्या कैद्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी आठ जणांना तपासलं.

तलवार दाम्पत्याची दर 15 दिवसांनी जेलवारी
प्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलावार दापत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे, असं कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी संगितलं. त्यामुळे तलावार दाम्पत्याला दर 15 दिवसांनंतर कारागृहात यावं लागणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
2008 साली आरुषी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता.

या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी 23 मे 2008 रोजी आरुषीचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयने चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टाने 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. 12 ऑक्टोबर 2017 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

संबंधित बातम्या :

तलवार दाम्पत्याकडून तुरुंगातील 1417 दिवसांची कमाई दान!


तलवार दाम्पत्याची आज सुटका, मात्र दर 15 दिवसांनी जेलवारी


अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर तलवार दाम्पत्य भावूक


आरुषी हत्याकांड : निकालाआधीच्या रात्री नेमकं काय घडलं?


आरुषी हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता