नवी दिल्ली : मॉरिशिअसला जाताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं विमान सलग 14 मिनिटे संपर्काबाहेर गेल्याने एकच खळबळ उडाली. मॉरिशिअसमधील यंत्रणेने तातडीने अलर्ट जारी करत विमानासोबत संपर्क होत नसल्याचं जाहीर केलं.


पायलटच्या चुकीमुळे विमानाशी संपर्क होऊ शकला नाही, असं नंतर समोर आलं. विमान सुखरुपपणे मॉरिशिअसला पोहोचलं आणि भारत आणि मॉरिशिअसमधील यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.

भारतीय विमान प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमान समुद्र कक्षेतून प्रवास करत असताना 30 मिनिटे संपर्क न झाल्यास अलर्ट जारी केला जातो. मात्र व्हीव्हीआयपी विमान असल्यामुळेच 14 मिनिटातच अलर्ट जारी करण्यात आला.

मॉरिशिअसच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतरही पायलटने एटीसीला (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधला नसल्यामुळे हा प्रकार घडला. सुषमा स्वराज भारतीय वायू सेनेच्या विमानाने प्रवास करत होत्या.

दक्षिण आफ्रिकेला जाताना सुषमा स्वराज मॉरिशिअसचाही दौरा करणार आहेत, जिथे त्या BRICS देशांच्या (Brazil, Russia, India, China and South Africa) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहतील.