नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय संबंधांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे.


कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम स्वराज यांनी भरला आहे. कुलभूषण जाधव यांना लढा देण्यासाठी लागेल ती कायदेशीर मदत केंद्र सरकार करेल, अशी हमी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली.

आपली बाजू स्पष्ट आहे. कुलभूषण जाधव यांनी कुठलंही गैर कृत्य केल्याचे पुरावे नाहीत, असं स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात लढताना कुलभूषण जाधव यांना भारतातले उत्तम वकील मिळवून दिले जातीलच, मात्र त्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी भारत सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज यांनी ही माहिती दिली.

हे प्रकरण भारत सरकार उचलून धरेल, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या. यामुळे हा मुद्दा भारत सरकार संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याचे संकेत मिळत आहेत.

कुलभूषण यांच्यासोबत सरकार पूर्णपणे न्याय करेल, असं आश्वासन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. तसंच त्यांच्या सुटकेसाठी काहीही करण्यास सरकारची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

राजनाथ सिंह काय म्हणाले?

“कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यवसाय करत होते. स्थानिक इराणी नागरिक त्यांचा व्यावसायिक भागीदार होता. व्यवसायानिमित्त ते तेहरानला येत-जात होते. मार्च 2016 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं. त्यानंतर पाक मीडियासमोर त्यांना भारताचे रॉ एजंट म्हणून भासवण्यात आलं.  पाक मीडियाला माहिती देताना कुलभूषण जाधवांकडे एक भारतीय पासपोर्ट मिळाला असं सांगण्यात आलं. जर त्यांच्याकडे पासपोर्ट मिळाला तर ते स्पाय कसं असू शकतील.

यावरुन पाकिस्ताचा खोटारडेपणा उघड होतोय. भारतीय दुतावासाकडून सातत्याने पाकिस्तानी दुतावासाशी संपर्क साधून, कुलभूषण जाधव यांना भेटण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र सातत्याने ती फेटाळून लावण्यात आली.

पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सर्व नियम, कायदे पायदळी तुडवून जाहीर केलेली फाशी चुकीची आहे. कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी काहीही करायला लागलं, तर ते आम्ही करु. कुलभूषण जाधव यांच्याशी न्याय होईल, असं मी आश्वासन देतो”

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

कोण आहेत कुलभूषण जाधव ?

जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

बलुचिस्तानात अटक

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती.

कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचं उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे.

भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही.

पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी 10 एप्रिलला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.  रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

भारताचे पाकिस्तानवर ताशेरे

कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.

कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत.

ठोस पुरावे नाहीत

हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवांविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं होतं.

मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:


सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी


… तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं


कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा


भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द


हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक


सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी