नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अलाहबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात 13 याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती अब्दुल नाजिर आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचाही समावेश आहे.


अलाहबाद हायकोर्टाने डिसेंबर 2010 साली वादग्रस्त 2.77 एकर जमीनीचं खटल्यातील तिन्ही पक्षांना समान भागात वाटप करावं, असा निकाल दिला होता. या निकालाला सुन्नी वक्फ बोर्ड (उत्तर प्रदेश), निर्मोही अखाडा, ऑल इंडिया हिंदू महासभा, रामलाला विराजमानसारख्या प्रमुख संघटनांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यानंतरही काहीजणांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी याचिकाकर्त्यांनी 90 हजारा पानांचे पुरावे सुप्रीम कोर्टासमोर सादर केले आहेत. त्याचे हिंदी, इंग्रजीसह एकूण सात भाषांमध्ये भाषांतर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. ते काम पूर्ण झाले आहे का? हे देखील आज सुप्रीम कोर्ट पाहाणार आहे.

दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाशिवाय, पाच किंवा सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाचीही मागणी याचिकाकर्त्यांकडून होऊ शकते. त्यावर जर सुप्रीम कोर्टाने असहमती दर्शवली, आणि दाखल पुराव्यांचे भाषांतराचे काम पूर्ण झाले असल्यास, आजपासून यावर दररोज सुनावणी होऊ शकते.