'इंडियाज मोस्ट वाँटेड' या शोचं अँकरिंग करणाऱ्या सुहेबने पत्नीची निर्घृण हत्या केली. आत्महत्या भासवण्यासाठी त्याने सुसाईड नोटची जबरदस्त स्क्रिप्टही लिहिली. मात्र पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.
1998 मध्ये सुहेबने 'इंडियाज मोस्ट वाँटेड' या क्राईम शोचं अँकरिंग सुरु केलं. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील तो सर्वात चर्चेतला चेहरा ठरला.
11 जानेवारी 2000 रोजी सुहेबची पत्नी अंजू इलियासीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. सुहेबने आधी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. अंजूचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचा बनाव त्याने केला, मात्र 17 वर्षांनी दिल्लीतील कनिष्ठ कोर्टाने अंजूच्या हत्येप्रकरणी सुहेबला दोषी ठरवलं.
सुहेबने पत्नीच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी आपल्या मित्राला दिली होती. तिने आत्महत्या केल्याचं सुहेबने सांगितलं. मात्र अंजूच्या कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांचं पित्त खवळलं. अंजू आत्महत्या करुच शकत नाही, तिच हत्या झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. मार्च 2000 मध्ये सुहेबला हुंडा आणि हत्येच्या आरोपातून बेड्या ठोकण्यात आल्या. काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर आला. अंजूच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली. 2014 मध्ये हत्येच्या आरोपाखाली तपास करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले.
कात्रीने वार करुन अंजूची हत्या झाल्याचं समोर आलं. दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडत असल्याचं समोर आलं. सर्व पुरावे पाहून कोर्टाने सुहेब इलियासीला अंजूच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं.
1989 मध्ये अंजू आणि साहेब एकत्र शिकत होते. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अंजूच्या कुटुंबाचा दोघांच्या नात्याला विरोध होता. विरोधानंतरही 1993 मध्ये दोघांनी लंडनमध्ये लग्न केलं. मात्र सातच वर्षात दोघांच्या नात्यात कटुता यायला सुरुवात झाली.