नवी दिल्ली : वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट दरम्यान पाकिस्तानी नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. पाकच्या नागरिकांकडून भारताच्या दिशेने दगड भिरकवण्यात आले.


पाकिस्तानाकडून उपस्थित असलेल्या नागरिकांनी बीटिंग रिट्रीटच्या वेळी भारताविरोधात घोषणाबाजीही केली. याबाबत रविवारीच एक फ्लॅग मीटिंग झाली असून बीएसएफकडून पाकिस्तानी रेंजर्सना पुन्हा या प्रकरणी बैठक घेण्यास सांगितलं आहे.

वाघा बॉर्डरवर होणारं बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आलं होतं. चार दिवसांपूर्वी झालेल्या लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत सरकारनं हा निर्णय घेतला होता.

वाघा बॉर्डरवर दररोज संध्याकाळी बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी दोन्ही देशाचे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. दररोज मोठ्या जल्लोषात इथं बीटिंग रिट्रीट होत असतं. पण  दोन्ही देशातील सीमेरेषेवर प्रचंड तणाव वाढल्यामुळे भारत सरकारनं हा निर्णय घेतला.