राज्याच्या 'डाळ दर नियंत्रण' विधेयकाच्या मसुद्याला केंद्राचा लाल दिवा
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2016 09:14 AM (IST)
नवी दिल्ली : राज्याच्या 'डाळी दर नियंत्रण’ विधेयकाच्या मसुद्यातील काही तरतुदींना आक्षेप घेत केंद्र सरकारने तो राज्य सरकारला परत पाठवला आहे. त्यामुळे हा प्रस्तावित कायदा लांबणीवर पडणार आहे. तूर, उडीद डाळीच्या दरांचा भडका उडून तो 200 ते 250 रुपयांच्या घरात गेल्याने मागील वर्षी हिवाळी अधिवेशानात राज्य सरकारने हा कायदा मंजूर केला होता. त्याचे प्रारुप तयार होण्यासाठी काही महिने झाल्यावर तो केंद्राच्या परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृह, अन्न आणि नागरीपुरवठा खात्यांच्या मंजुऱ्यांनंतर राष्ट्रपतींची मंजुरी अपेक्षित होती. मात्र शिक्षेच्या तरतुदीसह चार-पाच बाबींना केंद्राने काही आक्षेप घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी, प्रस्ताव राज्य सरकारला परत पाठवला आहे.