नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून काही केंद्रीय कंपन्या किंवा त्यातील हिस्सा विकण्याबाबतच्या हालचाली सुरु आहे. तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती देखील आहे. या सर्व प्रकरणांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं बाजारात विक्रीसाठी खुप काही उपलब्ध केलंय. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Continues below advertisement


राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणलं आहे, असं राऊत म्हणाले.


सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला 30 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्री सपत्तीचं मोठं नुकसान असल्याचंही राऊत म्हणाले.


'क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये?'
कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना देखील संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, माझी आई आणि भावालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय, असं राऊत म्हणाले. असंख्य लोक कोरोनातून बरे कसे झाले? 'क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये?' असा टोलाही त्यांनी लगावला.