अश्रू फक्त पदासाठी, पन्नीरसेल्वम यांची टीका
पन्नीरसेल्वम यांनी मात्र शशीकला यांच्या ‘अश्रू’ प्रकरणावर टीका केली. हे अश्रू फक्त पदासाठी असल्याचं पन्नीरसेल्वम म्हणाले. सध्या जयललितांना उत्तराधिकारी कोण होणार, यावरुन तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
शशीकला काय म्हणाल्या?
“एआयएडीएमकेच्या सरचिटणीस बनल्यानंतर अम्मांच्या समाधीस्थळी गेली होती. तिथून बाहेर पडू शकले नाही. कुठल्यातरी चुंबकीय शक्तीने मला समाथीस्थळापासून बाजूला जाऊ दिलं नाही. त्याच दिवशी मी शपथ घेतली, शेवटच्या श्वासापर्यंत अम्मांचा वारसा सांभाळेन.”, असं शशीकला म्हणाल्या.
शशीकला पुढे म्हणाल्या, “आपण सर्वांनी विजयाची शपथ घेतली पाहिजे. त्यानंतर आपण अम्मांच्या समाधीस्थळी जाऊन आपला विजय त्यांना समर्पित करु.”
पन्नीरसेल्वम यांच्यावर टीका
पन्नीरसेल्वम यांच्यावर टीका करताना शशीकाला म्हणाल्या, “पन्नीरसेल्वम मोठा कालावधी मंत्री होते. आज सर्व उद्ध्वस्त करु पाहत आहेत.”
शशीकला यांचं ‘महिला कार्ड’
पन्नीरसेल्वम यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून शशीकला यांनी नवी खेळी सुरु केली आहे. “महिला असल्यानेच अडचणी येत आहेत. जयललिता यांच्या वेळीही असंच होत होतं”, असं म्हणत शशीकला यांनी ‘महिला कार्ड’ वापरण्यास सुरुवात केली आहे.
शशीकला यांचा समर्थक आमदारांशी संवाद
शशीकला यांनी गोल्डन बे रिसॉर्टमध्ये जाऊन आपल्या समर्थक आमदारांशी संवाद साधला. याआधी शशीकला यांनी असेही संकेत दिलेत की, जर राज्यपालांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, तर त्या आंदोलन सुरु करतील.
तामिळनाडूमध्ये एकूणच राजकीय नाट्य रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात या राजकीय नाट्याचं चित्र स्पष्ट होईल आणि तामिळनाड आणि त्याचसोबत एआयडीएमकेवर कुणाचं वर्चस्व राहील, हेही स्पष्ट होईल.