नवी दिल्ली: 'गाय हा उपयुक्त पशू असल्यानं गायीची उपयुक्तता संपल्यानंतर ती शेतकऱ्यांवर ओझं बनू नये.' सावरकरांच्या या वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोहत्या बंदीवर वक्तव्य केलं. नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमात ते बोलत होते.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काल दिल्लीत एनडीएची बैठक झाली. त्यानंतर आज यूपीएतील नेते एकाच मंचावर आले. शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन आज दिल्लीत झालं. 'अपनी शर्तोंपर' असं या पुस्तकाचं नाव आहे. ‘गाय उपयुक्त पशु है, जब इसकी उपयुक्तता खतम हो तो किसानोंपर बोझ नही होना चाहिए.’ असं सावरकरच म्हणत होते. देशातल्या लोकांवर अशी जबरदस्ती चांगली नाही.’ असं वक्तवय यावेळी पवारांनी केलं.

काय म्हणाले शरद पवार नेमकं?

‘माझ्या आईनं बाळंतपणानंतर अगदी तीन दिवसांत पंचायत समितीच्या बैठकीला हजेरी लावली होती. कदाचित तेव्हापासूनच मला लोकांसाठी काम करायचं बाळकडू मिळालं. संसदीय राजकारणात मला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. देशात सध्या विचित्र स्थिती निर्माण झाल्याचं माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं. इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निर्णय घेतल्यावर सुरूवातीला चांगलं की वाईट याबद्दल संभ्रम होता. आम्हालाही सुरूवातीला आणिबाणी शिस्तीसाठी चांगली वाटली. पण नंतर याची भयावहता समोर आली. तेव्हाही इंदिराजींसमोर कुठला पर्याय विरोधकांना दिसत नव्हता. एक नेतृत्व नसतानाही लोकांनी बदल घडवला.’  असं पवार यावेळी म्हणाले.

‘आजही तशीच परिस्थिती आहे. अल्पसंख्यांक, दलित यांच्या मनात भय निर्माण होणं चांगलं नाही. राजकारण्यांपेक्षा मला या देशातल्या जनतेवर जास्त विश्वास आहे, ते काही अमंगल घडू देणार नाहीत. ‘गाय उपयुक्त पशु है, जब इसकी उपयुक्तता खतम हो तो किसानोंपर बोझ नही होना चाहिए.’ असं सावरकरच म्हणत होते. देशातल्या लोकांवर अशी जबरदस्ती चांगली नाही.’ असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

‘फुले-आंबेडकर यांच्या विचाराचा माझ्यावर पगडा हे दोघेही विचारांनी प्रचंड आधुनिक होते. महिला आरक्षणावर देशात कायदा बनण्याआधी सहा वर्षे मी माझ्या राज्यात कायदा केला. याचा अभिमान वाटतो. संरक्षण खात्यात महिलांना स्थान मिळवून दिलं.’ असंही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते  गुलाम नबी आझाद, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी, डी राजा, के सी त्यागी, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, अपक्ष खासदार आणि उद्योगपती नीरज शेखर यांची उपस्थिती होती.

सपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र या कार्यक्रमाला ते हजर नव्हते. काल एनडीएची बैठक झाल्यानंतर आज अप्रत्यक्षपणे यूपीएतील घटकपक्ष एकत्र दिसले.