श्रीनगर : लष्कर-ए-तोयबचा चीफ कमांडर अबु दुजानाचा भारतीय जवानांनी खात्मा केला. यानंतर काश्मीरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेतली जाते आहे.


काश्मीर खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, कालच्या हिंसक घटना आणि दगडफेकीनंतर काश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

फुटीरतावाद्यांनी आज बंदची घोषणा केल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काल झालेल्या हिंसेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाले. ज्यामधील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.

चकमकीत अबु दुजानाचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीदरम्यान भारतीय जवानांना मोठं यश मिळालं आहे. काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या हकरीपोरामध्ये भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा केला.

चकमकीत आणखी दोन अतिरेक्यांनाही कंठस्नान घालण्यात आलं आहे. सीआरपीएफची 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल आणि एसओजीच्या पथकाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.

कोण आहे अबु दुजाना?

2013 मध्ये दहशतवादी अबु कासिमच्या मृत्यूनंतर अबु दुजानाला लष्कर ए तोयबाचा कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य होतं. दुजानाला मारण्यासाठी सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते. सैन्याने त्याच्यावर 10 लाखांचं इनाम घोषित केलं होतं.

दक्षिण कश्मीरमध्ये अनेक कारवाई करणाऱ्या दुजानाचं नाव उधमपूर हल्ल्यात जिवंत पडकलेला दहशतवादी नावेदने घेतलं होतं. अबु दुजाना पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बालटिस्तानमध्ये राहत होता.

दुजानाचा यापूर्वीही सैन्याला चकवा

19 जुलैलाही सैन्याने अबु दुजानाला घेरलं होतं. पुलवामाच्या बंदेरपुरा गावात जवान आणि एसओजीच्या जवानांनी अबु दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. परंतु दुजाना चकवा देऊन पसार झाला. याआधी मे महिन्यातही सुरक्षादलाने हकरीपोरा गावातच दुजानाला घेरलं होतं. अबु दुजाना आपल्या साथीदारांसह गावात लपल्याची माहिती मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी सैन्याने ऑपरेशन सुरु केलं. यावेळी गावकऱ्यांच्या दगडफेक केल्याने अबु दुजानाला पळ काढण्यात यश आलं होतं.