नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाची आज सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 40 दिवस याप्रकरणी रोज सुनावणी सुरु होती, आज अंतिम सुनावणी होऊन दोन्ही पक्षांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला.


सुनावणी सुरु होताच एका वकिलाने अधिकची मुदत मागितली असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आजच सुनावणी पूर्ण होईल असं सांगता वकिलाचा हस्तक्षेप फेटाळला. कोर्टात सुनावणी सुरु असता अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील विकास सिंह यांनी सादर केलेला नकाशा ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी फाडला. राजीव धवन हे मुस्लिम पक्षाचे वकील आहेत.



किशोर कुणाल यांच्या अयोध्या रिविजिटेड या पुस्तकातील हा राम मंदिराचा नकाशा होता. या नकाशाच्या मदतीने विकास सिंह त्यांचा मुद्दा मांडत असता नकाशा फाडण्यात आल्याने कोर्टात वादविवाद झाला. मध्यस्थ समितीकडून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करण्यात आला.


हा खटला संवेदनशील असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणी 17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. 23 दिवसांनी या प्रकरणाचा अंतिम निर्णय होणार आहे. सुनावणी ज्या सरन्यायाधीसांसमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.