मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. आता एसबीआयच्या एटीएममधून दिवसाला फक्त 20 हजार रुपये काढता येतील. अगोदर ही मर्यादा 40 हजार रुपये प्रति दिन एवढी होती. ही मर्यादा एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांसाठी असेल.


एटीएमच्या वाढत्या फसवणुकीच्या घटना आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं एसबीआयचं म्हणणं आहे. आगामी महिने सण-उत्सवांचे आहेत. त्यामुळे एटीएमचा जास्तीत जास्त वापर केला जाईल, अशात फसवणुकीच्या घटना वाढू नयेत, हा या निर्णयामागचा हेतू असल्याचं एसबीआयने स्पष्ट केलं आहे.

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केल्यामुळे ग्राहकांना अडचण येणार नाही का, असा प्रश्न एसबीआयला विचारण्यात आला. एसबीआयने एक सर्वेक्षण केलं होतं, ज्यात आढळून आलं, की जास्तीत जास्त ग्राहक एटीएममधून कमी प्रमाणात पैसे काढतात, त्यामुळेच 20 हजार रुपयांची मर्यादाही कमी नाही, असं उत्तर या प्रश्नावर एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी दिलं.

सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असलं तरी देशात कॅशची मागणी वाढत आहे. ज्या ग्राहकांना जास्त पैशांची गरज असेल, त्यांनी जास्त मर्यादा असलेले डेबिट कार्ड घ्यावेत, असा सल्ला पी. के. गुप्ता यांनी दिला आहे. खात्यात जास्तीत जास्त किमान रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना अधिक मर्यादेचं डेबिट कार्ड दिलं जातं.

जाणकारांच्या मते, डेबिट कार्डधारक फसवणुकीला बळी पडत आहेत. डेबिट कार्ड पिनची चोरी एटीएमशिवाय जिथे पीओएसच्या माध्यमातून खरेदी केली जाते अशा मोठ्या दुकानांमध्येही होते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. चिप असलेल्या कार्डपेक्षा मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले डेबिट कार्ड फसवणुकीच्या दृष्टीने सर्वात जास्त असुरक्षित असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.