संघ-गांधी हत्येच्या वक्तव्यावर ठाम, अब्रूनुकसानीचा खटला लढणार : राहुल
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 10:33 AM (IST)
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार असल्याच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. 'संघाच्या व्यक्तींनी गांधींची हत्या केली', या वक्तव्यावर राहुल गांधी ठाम असल्याचं त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं. राहुल गांधी यांच्या या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा संघ विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगणार आहे. अब्रूनुकसानीचा खटला लढणार - राहुल गांधींच्या वकिलांनी सांगितलं की, राहुल त्यांचे शब्द मागे घेणार नाहीत. शिवाय अब्रूनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत. - सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेला अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राहुल गांधींनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ते कनिष्ठ कोर्टात लढणार आहेत. - तर कनिष्ठ कोर्टात स्वत: हजर राहण्यातून सूट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना नकार दिला आहे.