नवी दिल्ली : महागाईच्या दराने गेल्या 5 वर्षांतला उच्चांक गाठला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढवणार आहे. महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाज्यांच्या दरात तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच डाळी, मांस-मासे, दूध आणि इतर जीवनावश्यक गोष्टींमधल्या दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारसमोर महागाई नियंत्रित आणण्याचं नवं आव्हान असणार आहे.


किरकोळ महागाई दराने साडेपाच वर्षातील उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी जुलै 2014 मध्ये किरकोळ महागाई दर 7.39 टक्क्यांवर पोहोचला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये किरकोळ महागाई दर 5.54 होता. तर डिसेंबर महिन्यात हाच दर 7.35 टक्के इतका होता. तर डिसेंबर 2018 मध्ये हा दर 2.11 टक्के इतकाच होता. सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकड्यांवरुन ही माहिती समोर आली आहे.


जीवनावश्यक वस्तूचा दर वेगाने वाढत असल्याने किरकोळ महागाईचा दर झपाट्याने वाढत आहे. डिसेंबर महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूचा महागाई दर वाढून 14.12 टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर 2018 मध्ये हा दर शून्य ते 2.65 टक्क्यांच्या खाली होता. तर नोव्हेंबर 2019 मध्ये हा दर 10.01 टक्के होता. डिसेंबर 2019 मध्ये भाज्यांच्या किमतीत 60.5 टक्क्यांनी वाढ झाली होती. डाळींच्या किमतीत 15.44 टक्क्यांनी, मांस-माशांचे दर 9.57 टक्के, अंड्यांचे दर 4.45 टक्क्यांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई दर चार टक्कांच्या आत ठेवण्याचे लक्ष्य दिलं आहे. मात्र महागाई दर रिझर्व्ह बँकेला दिलेल्या लक्ष्याच्या खुप पुढे गेला आहे.