नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरील सस्पेंन्स अजूनही कायम असून, भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या संचालिका अरुंधती भट्टाचार्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण भट्टाचार्य यांनी या वृत्ताचे खंडन करून, यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया देणेही टाळले.


 

भट्टाचार्य यांना आरबीआयच्या रघुराम राजन यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्या उद्विग्न झाल्या. त्या म्हणाल्या की, ''यासाठी मी कोणत्याही प्रकारे लॉबिंग करत नाही. तुम्ही पत्रकारच यासंबंधीचे कयास बांधत आहात. या मुद्द्यावर मी कोणती प्रतिक्रीय देणार नाही. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे.

 

 

राजन यांनी आकादमीत परतण्याची इच्छा व्यक्त करून दुसऱ्यांदा गव्हर्नर पदाची धुरा सांभाळण्यावर पुर्णविराम दिला. त्यानंतर राजन यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी एसबीआय संचालिका भट्टाचार्य यांच्या नावासोबतच इतरही काही नावांची चर्चा सुरु होती. यामध्ये आर्थिक विषयावरील सचिव शक्तिकांत दास, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्यूटी गव्हर्नर उर्जित पटेल आदींच्या नावाचीही चर्चा आहे.

 

गव्हर्नरपदाच्या नावावरील निश्चिती पंतप्रधानांकडून अर्थमंत्र्यांच्या सहमतीनेच होते. यावेळीही अशाच प्रकारे नव्या गव्हर्नरांचा राज्याभिषेक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात चर्चा होऊनच या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाल १९९१ सालांनरच्या उदारीकरणाच्या काळातील सर्वात कमी कार्यकाल ठरणार आहे.