लखनौ (उत्तर प्रदेश) : राम मंदिर बनवण्याची शपथ घेऊन, अयोध्येतून रामराज्य रथयात्रा रवाना झाली आहे. 40 दिवसांनंतर रामराज्य रथयात्रा रामेश्वरममध्ये पोहोचेल आणि तिथेच या यात्रेचा समारोप होईल.


रामदास मिशनची ही रथयात्रा असल्याचे म्हटले जात असले, तरी या यात्रेमागे भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद एकवटली आहे. या यात्रेच्या रुपाने कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माहौलही तापवण्याची तयारी सुद्धा केली जात असल्याची चर्चा आहे.

अयोध्येच्या कारसेवकपुरममध्ये साधू-संत, भाजप आणि विहिंपचे नेते जमा झाले होते. तिथे भाषण झालं, पूजा झाली, अयोध्येत राम मंदिर बनवण्याची शपथ घेण्यात आली, ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर रामराज्य रथयात्रा अयोध्येतून रामेश्वरमसाठी रवाना झाली. महाशिवरात्रीला सुरु झालेल्या या रथयात्रेचा रामनवमीला समारोप होईल.

रामदास मिशनचे महामंत्री शक्ती शांतनंद म्हणाले की, “आता सगळीकडे सरकार केवळ रामभक्तांचेच बनतील. पाहा दिल्लीत (केंद्रात) मोदी, तर यूपीत योगी आहेत. आता वेळ बदलत आहे.”

रामदास मिशन आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं जुनं नातं आहे. त्यामुळे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी योगींना बोलावण्यात आले होते. मात्र त्रिपुरातील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या योगींना इथे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे रथयात्रा सुरु करण्यासाठी फैजाबादहून भाजप खासदार लल्लू सिंह आणि अयोध्येहून भाजपचे महापौर पिंटू उपाध्याय आले होते. विहिंपचे महामंत्री चंपत रायही हजर होते.

यात्रेसाठी जे रथ तयार करण्यात आले आहे, ते राम मंदिराच्या प्रतिकृतीसारखे आहे. यात्रेच्या मार्गात मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही दोन राज्यही आहेत. याच वर्षी एप्रिल-मे महिन्यात कर्नाटकमध्ये, तर वर्षअखेरपर्यंत मध्य प्रदेशात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सरकार आणण्याचे, तर मध्य प्रदेशात सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. त्यासाठी रामराज्य रथयात्रा मदतीला धावेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रथयात्रेचा प्रवास कसा असेल?

15 फेब्रुवारी - वाराणसी
16 फेब्रुवारी - अलाहाबाद
16 फेब्रुवारी - चित्रकूट
19 फेब्रुवारी - भोपाळ
20 फेब्रुवारी - उज्जैन
21 फेब्रुवारी - इंदौर
25 फेब्रुवारी - औरंगाबाद
8 मार्च - बंगळुरु
10 मार्च - म्हैसूर
13 मार्च - कोझीकोड
21 मार्च - रामेश्वरम
22 मार्च - कन्याकुमारी