लखनौ : अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत आणि त्यासाठीच्या हालचालींना वेगही आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.


दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे उद्या श्री श्री रविशंकर अयोध्येलाही भेट देणार आहेत. तर तिकडे अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी शिया वक्फ बोर्डानं सहमती दाखवली आहे.

राम मंदिराच्या वादावर चर्चा करण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महेंद्र गिरी यांच्यात सकारात्मक बैठक झाली. पण शिया बोर्डाच्या भूमिकेवर सुन्नी बोर्डानं आक्षेप घेतला आहे.

दरम्यान अयोध्या वादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 5 डिसेंबरपासून अयोध्या वादावर तीन न्यायधीशांच्या खंडपीठाकडून सुनावणी सुरु होणार आहे.



राम मंदिर प्रकरणावर एक नजर

  • अयोध्येत श्री रामाचा जन्म झाल्याची धारणा हिंदूंची आहे.



  • हिंदू पक्षाचा आरोप आहे की 16 व्या शतकात राम मंदिर तोडून बाबरी मस्जिद बांधण्यात आली.



  • ज्यावेळी मशिदीत श्री रामाची मूर्ती ठेवली तेव्हापासून म्हणजेच 1949 पासून हा वाद सुरु आहे.



  • 1980 च्या शेवटी आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातील भाजपने हा मुद्दा हाती घेतला.



  • 6 डिसेंबर 1992 रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली.


 

2010 मध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला होता?

  • अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील विवादित स्थळ राम जन्मभूमी असल्याचं मान्य केलं होतं.



  • हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी निर्णय देताना, जमीनीचा एक तृतीयांश जागा मुस्लिम गटाला दिली होती. तीन गटात ही जमीन विभागण्याचा निर्णय दिला होता. मात्र त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं होतं.



  • श्री रामाची मूर्ती 22/23 डिसेंबर 1949 च्या रात्री मशिदीत ठेवली असं हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी म्हटलं होतं.



  • भारतीय पुरातत्व विभागाने मशिदीच्या जागी खोदकाम केलं होतं, त्यावेळी त्यांना भव्य प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले होते.



  • हा खटला गेल्या 65 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे.


 

संंबंधित बातम्या: