Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुका (Rajya sabha Election) होत आहेत,  यातील 41  जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर चार राज्यातील 16 जागांसाठी आज 10 जून रोजी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील चार मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman), पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांचा समावेश आहे. तर जेडीयूच्या कोट्यातून मंत्री असलेले आरसीपी सिंह (RCP Singh) यांचा कार्यकाळ संपत आलाय.  


भाजपने निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना कर्नाटकमधून उमेदवारी दिली आहे तर  गोयल यांना महाराष्ट्रातून तिकीट दिलेय.  मुख्तार अब्बास नकवी यांचा पत्ता कट करण्यात आलाय. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा आहे.  


कुणाचं मंत्रिपद जाणार?
भाजपने दोन मंत्र्यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी संधी दिली आहे. निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना राज्यसभेचं तिकिट दिलेलं नाही. त्याशिवाय  जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्री असणारे आरसीपी सिंह यांनाही पार्टीने तिकीट दिले नाही.  जेडीयूने आरसीपी सिंह यांच्याऐवजी खीरू महतो यांना राज्यसभेचं तिकीट दिलेय.  


मुख्तार अब्बास यांचं मंत्रिपद धोक्यात!
मुख्तार अब्बास नकवी सध्या झारखंडमधून राज्यसभा खासदार आहेत. सात जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ संपेल.  मुख्तार अब्बास नकवी आणि आरसीपी सिंह यांचा राज्यसभेचा पत्ता कट झाल्यानंतर आता मंत्रिपदही धोक्यात आलेय. नियमांनुसार, जर सहा महिन्यात मुख्तार अब्बास नकवी आणि आरसीपी सिंह संसदेत पोहचले नाही तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. दरम्यान, भाजपने झारखंडमधून राज्यसभासाठी मुख्तार अब्बास नकवी यांच्या जागी आदित्य साहू यांना संधी दिली आहे. असे म्हटले जातेय की, मुख्तार नकवी यांना दुसऱ्या राज्यात तिकीट दिले जाईल.