पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील शेतकरी आंदोलनाला आजपासून मध्य प्रदेशातील मंदसौरपासून सुरुवात होत आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करेल. ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दिल्लीत पोहचणार आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन खासदार राजू शेट्टींनी केलं आहे.


“मध्य प्रदेशातील मंदसौरपासून किसान मुक्ती यात्रेची सुरुवात होईल. या यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचेल. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील.”, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती.

नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून महाराष्ट्र सरकारनंच कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड केलंय, असा आरोपही शेट्टींनी केला होता. तसंच सदाभाऊ खोत यांनी आपल्यावर कितीही आरोप केले तरी महाराष्ट्र आपल्याला गेली 25 वर्षं ओळखतो असंही राजू शेट्टी म्हणाले.

सदाभाऊ खोत यांच्याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे या तक्रारींबाबत सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

“पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीसमोर 4 जुलैपर्यंत सदाभाऊंनी आपली बाजू मांडावी. त्यानंतर सदाभाऊंबाबत निर्णय घेतला जाईल.”, असे राजू शेट्टी म्हणाले.

“सदाभाऊ खोत यांची भूमिका इथून पुढे ‘स्वाभिमानी’ची अधिकृत मानली जाणार नाही. प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मांडतील.”, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.