नवी दिल्ली : काँग्रेसने मंगळवारी लोकसभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरुन जोरदार गोंधळ केला. यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनाच घेरलं आणि सुरक्षेचे प्रोटोकॉल तोडल्याबद्द जाब विचारला.


सभागृहात काँग्रेस खासदारांची जोरदार घोषणाबाजी सुरु असतानाच राजनाथ सिंह यांनी सरकारची बाजू मांडली. राहुल गांधी वारंवार बुलेटप्रूफ गाडी घेणं टाळतात. शिवाय परदेश दौऱ्यावर जाताना विशेष संरक्षण कवचही (एसपीजी) घेत नाहीत, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

‘’एसपीजीचा सल्ला न ऐकता बुलेटप्रूफ कार नाकारली’’

संसदेच्या कायद्यानुसार राहुल गांधींना एसपीजी संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांच्या गुजरात दौऱ्याची पोलिसांनी आणि प्रशासनाने संपूर्ण तयारी केली होती. राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सुचनेनुसार सुरक्षा रक्षक, पेट्रोलिंग, जॅमर्स आणि बुलेटप्रूफ कारची व्यवस्था तैनात करण्यात आली होती. राहुल गांधींचा दौरा असलेल्या धनेरा या ठिकाणी दोन पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी, 6 पोलीस उपअधीक्षक आणि मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

थावर हेलिपॅडवर उतरुन राहुल गांधी बुलेटप्रूफ कारकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकाने (पीएस) त्यांना नॉन बुलेटप्रूफ कारने जाण्याचा सल्ला दिला. राहुल गांधींनी एसपीजी अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि पीएसच्या म्हणण्याप्रमाणे ते साध्या कारने गेले. पुढील प्रवासातही त्यांनी प्रोटोकॉल मोडले आणि अनेक अशा ठिकाणी थांबले, जी ठिकाणं दौऱ्यात नव्हती, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

‘’121 दौऱ्यात 100 वेळा प्रोटोकॉल मोडले’’

सुरक्षेचे प्रोटॉकॉल सतत मोडल्यामुळे राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांना चांगलंच घेरलं. राहुल गांधींनी 31 जुलैला राजस्थान दौरा केला तेव्हाही बुलेटप्रूफ कारचा वापर केला नाही. गेल्या दोन वर्षात त्यांनी 121 दौरे केले आहेत. यापैकी 100 दौऱ्यांमध्ये त्यांनी प्रोटोकॉल मोडत बुलेटप्रूफ कारचा वापर केला नाही, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

‘’परदेश दौऱ्यात एसपीजी का नाकारता?’’

राहुल गांधी यांनी गेल्या 2 वर्षात 6 परदेश दौरे केले, ज्यामध्ये ते 72 दिवस देशाबाहेर राहिले. यापैकी 72 दिवसही त्यांनी एसपीजी सुरक्षा घेतली नाही. परदेश दौऱ्यात राहुल गांधींनी एसपीजी सुरक्षा का नाकारली, ते काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट करावं, अशी मागणीही राजनाथ सिंह यांनी केली.