Rajasthan Night Curfew : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसतो आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशानंतर आता राजस्थान सरकारनेही खबरदारीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानातील 8 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह मास्क न घातल्याबद्दल दंड वाढवून 500 रुपये केला आहे. तर राजधानी जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त असलेल्या 8 जिल्ह्यांच्या (जयपूर, जोधपुर, कोटा, बीटेकर, उदयपुर, अजमेर, अलवर आणि भीलवाड़ा) शहरी भागात  बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि अन्य व्यावसायिक संस्था सात वाजेपर्यंतचं सुरु राहतील. या 8 जिल्ह्यांच्या शहरी भागात रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू राहील.


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यात विवाह सोहळ्यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमांमध्ये सामील होणाऱ्या लोकांची संख्या 100 करण्यात आली आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांत कर्फ्यू


यापूर्वी मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता, नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भोपाळ, इंदौर, विदिशा, रतलाम आणि ग्वाल्हेर या पाच जिल्ह्यांत शनिवारीपासून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राज्यात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.


गुजरात सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू अहमदाबाद शहरात शुक्रवार (20 नोव्हेंबर) रात्री 9 ते सोमवारी (23 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजेपर्यंत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गुजरात सरकारने नव्याने लॉकडाउन करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रात काही शहरांत मुंबई, ठाण्यात 31 डिसेंबर पर्यंत शाळा बंद राहणार आहे. याबाबत पालिकेने आदेश जारी केले आहेत.