कोटा : राजस्थानमध्ये मागील काही दिवसांत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार असून या मुद्यावरून भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. अशातच या घटनेबाबत बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, देशात आणि राज्यात अशा गोष्टी घडत असतात. यात काहीही नवीन नाही. तसेच मृतांचा आकडा सांगत त्यांनी दावा केला की, मागील सरकारपेक्षा त्यांच्या सरकारच्या काळात मृत्यू दरात घट झाली आहे.


पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, 'जर आकडे सागांयचे झाले तर, गेल्या 6 वर्षांपैकी सर्वात कमी मृत्यू यंदाच्या वर्षी झाले आहेत. एका बालकाचा मृत्यू होणं हीदेखील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. परंतु, गेल्या काही वर्षात 1500, 1400, 1300 देखील मृत्यू झाले आहेत. यावर्षी जवळपास 900 बालकांचा मृत्यू झाला आहे.'


900 बालकांचा मृत्यू झाल्याच्या आकडेवरीव स्पष्टिकरण देताना गहलोत म्हणाले की, 'संपूर्ण देश आणि राज्यात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तीन, चार, पाच, सात मृत्यू दररोज होत असतात. यामध्ये काही नवीन नाही. मी याबाबत संपूर्ण चौकशी केली असून आम्ही त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुढे बोलताना गहलोत यांनी दावा केला की, 'आमच्या सरकारच्या काळात आम्ही हॉस्पिटल्समधील ऑपरेशन थिएटर्स अपग्रेड केले होते.'

'आम्ही राज्यातील बालकांचा मृत्यूदर घटवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेव्हा मी निरोगी राजस्थान असं म्हणालो होतो, त्यावेळी त्यामध्ये या मुद्याचाही समावेश होता. राज्यात आयएमआर, एमएमआर यासंदर्भातील आकड्यांमध्ये घट झाली आहे. हॉस्पिटलमध्ये आई आणि बालकांचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.' असंही मुख्यमंत्री गहलोत म्हणाले.


दरम्यान, मागील काही दिवसांपासून कटोमधील जे.के.लोन हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत जवळपास दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. ही सर्व बालकं हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डमध्ये भरती होती. तसेच, असं सांगण्यात येत आहे की, डिसेंबर महिन्यात याच हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात जवळपास 77 मुलांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

राहुल गांधींना 'लायर ऑफ इ द ईयर' पुरस्काराने गौरवण्यात यावं; प्रकाश जावडेकरांची राहुल गांधींवर टीका