नवी दिल्ली : तुम्ही रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर झोपण्यासाठीचे ब्लँकेट सोबत घेऊनच निघा. कारण यापुढे एसी कोचमध्ये ब्लँकेट न पुरवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.


ब्लँकेट आणि चादरींच्या अस्वच्छतेबाबतच्या वाढत्या तक्रारीनंतर कॅगनं ताशेरे ओढले. यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

ब्लँकेटसाठी रेल्वे प्रत्येक प्रवाशाकडून 22 रुपये आकारतं. मात्र, ती खराब झाल्यानंतर धुण्यासाठी 55 रुपयांचा खर्च येतो. हा खर्च रेल्वेला परवडत नाही. रेल्वेची ब्लँकेट धुण्याची स्वत:ची यंत्रणा नाही. खासगी कंत्राटदार ब्लँकेट धुताना दर्जा राखत नाही. त्यामुळे रेल्वेला ब्लॅकेटची स्वच्छता राखणं शक्य होत नाही. त्यामुळे आता रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर प्रवाशांना एसी डब्यात थंडी वाजू नये म्हणून एसी कोचचं तापमान 19 ऐवजी 24 अंश सेल्सिअस ठेवलं जाणार आहे. जेणेकरुन प्रवाशांना एसी कोचमध्येही ब्लँकेटची गरज भासणार नाही, असं रेल्वेचं म्हणणं आहे.

दरम्यान, एकदा वापरुन फेकता येतील अशी ब्लँकेट्स आणि चादरी प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षी सूचवले होते. मात्र, त्यावरही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.