Rahul Gandhi Addresses Indian Diaspora:  काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी सोमवारी (5 जून) स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. आपल्या भाषणात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. ज्यात एकीकडे नथुराम गोडसेची विचारधारा आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा आहे. महात्मा गांधींच्या विचारसरणीनं आम्ही पुढे जात आहोत. 


काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्कोचा प्रवास करून ते न्यूयॉर्कला पोहोचले. मॅनहॅटन येथील जेविट्स सेंटर येथे त्यांनी भारतीय वंशांच्या लोकांना संबोधित केलं. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, "हा एक अद्भुत प्रवास होता. या पाच-सहा दिवसांत भारतीय समुदायानं आमच्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवलं, खरंच हे खूप छान होतं."


राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, "जेव्हा मी इथे येतो आणि तेव्हा तुम्हा सर्वांना आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना पाहतो. मला अभिमान वाटतो, कारण तू ज्या पद्धतीनं तुम्ही वागलात, तुम्ही दाखवलेली माणुसकी, तुच्याकडे असलेली स्वीकृती, तुमच्यापैकी कोणी म्हणजे, कोणीच अहंकार घेऊन इथे आलेलं नाही. तुम्ही भारतातून अहंकार आणला नाही." 


तुमच्यासारखे लाखो लोक आमचे राजदूत : राहुल गांधी 


काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही येथे मर्यादित संसाधनं घेऊन आलात आणि तुम्ही काहीतरी अद्भुत घडवलं. तुमच्या सर्वांचा प्रवास वेगळा आहे, कमी किंवा जास्त महत्त्वाचं नाही. दुसरी गोष्ट तुम्ही केली ती म्हणजे, तुम्ही अमेरिकेची संस्कृती, अमेरिकेची भाषा, अमेरिकेचा इतिहास, अमेरिकेतील विविध धर्म स्वीकारले. 


ते म्हणाले की, तुम्ही अमेरिकेची संस्कृती, धर्म, इतिहास यांच्याशी लढण्यासाठी किंवा शिवीगाळ करण्यासाठी येथे आला नाहीत. तर आमच्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासारखे लाखो लोक आमचे राजदूत आहेत, जे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या देशाच्या विशिष्ट दृष्टीचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की, घरात (भारत) लढाई सुरू आहे.


दोन विचारधारांमध्ये युद्ध : राहुल गांधी 


राहुल गांधी म्हणाले की, "जर दोन विचारधारांमध्ये युद्ध होत असेल, एक ज्या विचारधारेचं प्रतिनिधीत्व आम्ही करतोय आणि दुसरी ज्याचं प्रतिनिधीत्त्व भाजप आणि आरएसएस करतंय. मला वाटतं की, या लढाईचं वर्णन करण्याचा सर्वात सोपा मार्ग हाच आहे की, एकीकडे तुमच्याकडे महात्मा गांधी आहेत आणि दुसरीकडे नथुराम गोडसे." पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "त्यावेळी अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती असलेल्या ब्रिटिशांशी गांधीजींनी युद्ध केलं. तुम्ही लोक गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत आहात." 


"मी म्हणू शकतो की, एकडीकडे महात्मा गांधींप्रमाणे धाडसी NRI आहेत, किंबहुना अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात प्रभावशाली NRI आहेत. एक अशी व्यक्ती, जी नम्र, सर्वसाधारण माणूस, पण भारतावर विश्वास ठेवणारी आहे.", असं राहुल गांधी म्हणाले. 


गोडसे केवळ भूतकाळाबाबत बोलायचा : राहुल गांधी 


ते म्हणाले, "गांधीजी पुढचा विचार करणारे, आधुनिक, खुल्या मनाचे होते, गोडसे फक्त भूतकाळाबद्दल बोलायचा, तो कधीही भविष्याबद्दल बोलत नव्हता, फक्त भूतकाळाबद्दल बोलायचा, तो रागावलेला, द्वेष करणारा आणि स्पष्टपणे घाबरलेला होता, तो मनाने भित्रा होता. तो आयुष्याला सामोरं जाण्यास असमर्थ होता. दुसरीकडे गांधींनी पृथ्वीवरील सर्वात मोठ्या शक्तीचा सामना केला, एक महासत्ता, आजच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकापेक्षा अधिक शक्तिशाली." पुढे बोलताना, महात्मा गांधी सत्याचं पालन करायचे आणि विनम्र होते. तुम्हीही सर्व महात्मा गांधी, आंबेडकर, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत आहात, असंही ते म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rahul Gandhi In US: "भारताची सभ्यता कोणाचाही द्वेष करणं किंवा कोणाचा अपमान करणं नाही"; न्यूयॉर्कमध्ये राहुल गांधींनी सांगितली 'मोहब्बत वाली बात'