नवी दिल्ली : अनेक वाद आणि सस्पेन्सनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये सरकारने इन्कम टॅक्सबाबत मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे.
2.5 लाख ते 5 लाखा उत्पन्न असणाऱ्यांना आता 10 टक्क्यांऐवजी 5 टक्केच व्याज द्याव लागणार आहे. परंतु विरोधक या अर्थसंकल्पावर फारसे खूश दिसत नाहीत. "मोदी सरकारचा हे बजेट शेर-ओ-शायरीचा असून त्यात विशेष असं काही नाही,"अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
गंभीर स्वभावाचे असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट सादर करताना शेर-ओ-शायरीचा आधार घेतला. बजेटच्या सुरुवातीलाच जेटली यांनी एक शेर वाचला.
इस मोड़ पर घबराकर न थम जाइए आप जो बात नई उसे अपनाइए आप डरते हैं नई राह पर क्यूं चलने से हम आगे आगे चलते हैं आइए आप” भाषणादरम्यान अरुण जेटली यांनी काळ्या पैशांबाबत शेर वाचून दाखवला.
नई दुनिया है, नया दौर है, नई है उमंग कुछ थे पहले के तरीके, तो कुछ है आज के रंग ढंग रोशनी आके अंधेरों से जो टकराई है, काले धन को भी बदलना पड़ा आज अपना रंग” बजेट सादर झाल्यानंतर मीडियाशी बातचीत करताना राहुल गांधी म्हणाले की, "हा शेर-ओ-शायरीचा अर्थसंकल्प आहे. यात शेतकऱ्यांसाठी काही नाही. तरुणांच्या रोजगारासाठी काही तरतूद नाही. भाषण केलं पण ठोस असं काहीच केलेलं नाही. पण राजकीय पक्षांच्या फंडिंगबाबत घेतला निर्णय चांगला आहे, आम्ही त्याचं कौतुक करतो."
"भारत सध्या बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे. पण बजेटमध्ये यासाठी काहीच केलेलं नाही. शिवाय त्याबाबत व्हिजन किंवा कल्पना नाही. शेतकऱ्यांसाठीही बजेटमध्ये कोणतीही विशेष तरतूद नाही. बजेटकडून आम्हाला अपेक्षा होत्या, पण त्या काही पूर्ण झालेल्या नाहीत. नोटाबंदीनंतर सरकारने गरीबांवर जणू काही हातोडाच चालवला होता, पण गरीब, शेतकरी, बेरोजगारांसाठी त्यांनी काहीही केलं नाही," असंही राहुल गांधी म्हणाले.